adsense

भारताचा एक थोर शास्त्रज्ञ - डॉ. विक्रम साराभाई : Vikram Sarabhai Biography in Marathi

डॉ. विक्रम साराभाई


Vikram sarabhai information
Vikram Sarabhai Mahiti


            भारतीय शास्त्रज्ञांची नावे घेताना डॉ. विक्रम साराभाई यांचे नाव अग्रभागी घ्यावे लागेल. या शास्त्रज्ञाची साथ भारताला दुर्दैवाने फार काळ लाभली नाही. १९७१ हे वर्ष संपता संपता भारत आपल्या एका मानवरत्नाला मुकला. अंतराळयुगात भारत नुकतीच पावले टाकू लागला होता, तोच क्रूर काळाने त्याच्या जन्मदात्यालाच आपल्यातून उचलून नेले. हा आघात अतिशय अनपेक्षित होता. डॉ. विक्रम साराभाई त्रिवेंद्रमजवळील मुंबा या आंतर राष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्राच्या परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी त्रिवेंद्रमजवळील 'कोणालम्' येथे गेले होते. तेथील समुद्रकिनारी एका हॉटेलात झोपेतच हृदयविकाराच्य तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

 
             डॉ. विक्रम साराभाई म्हणजे भारताला मिळालेला एक अनमोल ठेवा होता. सहसा न आढळणारा श्री आणि सरस्वती यांचा संगम डॉ. विक्रमांच्या रूपाने साकार झाला होता. त्यांचा जन्म अहमदाबाद येथील अतिशय विख्यात अशा श्रीमंत घराण्यात १२ ऑगस्ट १९१९ ला झाला. प्रसिद्ध उद्योगपती अंबालाल साराभाई हे त्यांचे वडील होते. विक्रमचा असामान्य बुद्धिमत्ता पाहून त्यांनी विक्रमच्या शिक्षणासाठी सर्व व्यवस्था घरच्या घरीच केली. निरनिराळे प्रयोग करण्याची त्याची हौस भागवण्याकरता अहमदाबाद येथे एक खास मोठी सुसज्ज प्रयोगशाळा बांधून घेतली गेली. त्यामुळेच महाविद्यालयात जाण्यापूर्वीच विक्रमला विज्ञान व वैज्ञानिक प्रयोग यांचे विलक्षण वेड लागले होते.

  
             अहमदाबादला महाविदयालयीन अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विक्रम साराभाई लंडनला गेले आणि केंब्रिजमधील सेंट जॉन कॉलेजात त्यांनी गणित-विज्ञानाचा अभ्यास केला. १९४७ साली 'विश्वकिरण' या विषयावर केंब्रिज विद्यापीठाची त्यांना 'डॉक्टरेट' मिळाली. यानंतरचे आपले आयुष्य त्यांनी वैज्ञानिक संशोधनासाठी वाहिले. अनेक वैज्ञानिक संस्थांचे जनकत्व त्यांच्याकडे जाते.

 
             १९६६ साली डॉ. होमी भाभा यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूनंतर भारतीय विज्ञान जगतात पोकळी निर्माण झाली. तेव्हा डॉ. साराभाईंनी देशासाठी भारतीय अणुशक्ती महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. बाह्य अवकाशाचा उपयोग जागतिक शांतता संवर्धनासाठी व संशोधनासाठी कसा करता येईल हे पाहण्यासाठी संयुक्त राष्ट्रातर्फे जो परिषद होणार होती, तिचे डॉ. विक्रम साराभाई अध्यक्ष होते.

 
            साराभाईंना विज्ञानाप्रमाणे कलेचीही विलक्षण आवड होती. १९६२ साली त्यांना 'एम्. एस्. भटनागर' पारितोषिक मिळाले होते, तर १९६६ साली त्यांना भारत सरकारने 'पद्मभूषण' हा किताब अर्पण केला होता.

         थुंबा येथील प्रक्षेपण केंद्राला त्यांचे नाव देऊन भारतीयांनी या वैज्ञानिकाचा सत्कार केला आहे.