एकीकडे वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेचा आनंद फक्त एका विशिष्ट वर्गालाच मिळत असून दुसरीकडे बेरोजगारीच्या प्रमाणात अधिक वाढ होत आहे. शहरी भागात बेरोजगारी आहेच. पण यंदा ग्रामीण भागातील तरुणांच्या हाती काम नसल्याचे आकडे बोलत आहेत.
आपला भारत दोन विरुद्ध प्रवाहावर स्वार झालेला आहे. एकीकडे झपाट्याने अर्थव्यवस्था पूर्वस्थितीत येत आहे. त्याचवेळी अर्थव्यवस्थेसमोर महागाई, मंदी, बेरोजगारी -Unemployment, उद्योगाचं पलायन, कर्ज दरातील वाढ अशा एक ना अनेक प्रश्नांची मालिका ठामपणे उभी ठाकली आहे. बेरोजगारीच्या या भयानक प्रश्नावर अद्यापही मोठा उपाय सापडलेला दिसून येत नाही.
पूर्वीपासूनच रोजगार निर्मितीत म्हणावी तशी प्रगती साधता आली नाही. जे मोठे रोजगार निर्मित करणारे वेदांता सारखे उद्योग प्रकल्प दुसऱ्या राज्यात जात आहेत, तर ज्या स्टार्टअपचे - Startup आपण सर्व गोडवे गात आहोत. त्यांच्या धरसोड वृत्तीने सुशिक्षित आणि कुशल कामगारांची चेष्टा सुरु होत आहे. दोन-तीन महिने हे स्टार्टअप नोकऱ्या देतात आणि कुठलेही ठोस कारण न देता तरुणांना कामावरुन कमी करतात. तर ग्रामीण भागात कमी पाऊस, अतिवृष्टीने तेथील तरुण जगण्याच्याच प्रश्नाने आवासला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात यंदा बेरोजगारीचे प्रमाण जलदगतीने वाढल्याचे दिसून येतह. एकीकडे जागतिक पातळीवर भारतीय अर्थव्यवस्थेने पाचवे स्थान पटकावले आहे. पण बेरोजगारीच्या या महामारीवर सरकारला अधिक उपाय योजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे.