थोर स्वातंत्र्यसैनिक - सेनापती बापट
Senapati Bapat Mahiti |
लष्करात केव्हाही न गेलेले तात्या अमर झाले ते 'सेनापती' म्हणून! ही उपाधी त्यांना कुठल्याही राजसत्तेने दिली नव्हती. त्यांचे कार्य, त्यांचे नेतृत्व पाहून जनता जनार्दनाने त्यांना ती बहाल केली होती. सेनापती बापटांचे पूर्ण नाव होते, पांडुरंग महादेव बापट. पण त्यांच्या आप्तमित्रांत ते 'तात्या' म्हणूनच ओळखले जात आणि पुढे तेच नाव जनमानसातही रूढ झाले.
लहानपणी खट्याळपणा करून आईला काळजीत टाकणारा पांडुरंग असामान्य बुद्धीचा ठरला, तेव्हा इतर भावांनी आपल्या सुखांचा त्याग करून त्याला शहरात शिक्षणासाठी पाठवले. तात्या बी. ए. झाले आणि इंजिनीअर होण्यासाठी १९०४ मध्ये ते अमेरिकेत गेले. त्यासाठी त्यांना मंगलदास शिष्यवृत्ती व हिंदू एज्युकेशन निधीतून मदत मिळाली होती. तेथे एका हेमंत व्याख्यानमालेत तात्यांनी भाषण केले. विषय होता 'भारतातील ब्रिटिश राज्यकत्यांची सत्ता बापटांच्या या अभ्यासपूर्ण भाषणाने त्यांच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळाली. त्यांची शिष्यवृत्ती बंद झाली. त्यामुळे पुढील शिक्षण त्यांनी तेथेच थांबवले व ते क्रांतिकार्यात सहभागी झाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा यांच्या सान्निध्यात ते आले. यावेळी 'सशस्त्र क्रांती'चा विचार बापटांनी प्रथम स्वीकारला. आपल्या रशियन स्नेह्यांच्या मदतीने त्यांनी बॉम्ब तयार करण्याची विद्या हस्तगत केली. या विद्येचा वापर करण्यासाठी तात्या मायदेशी परतले. पण 'माणिकतोला बाग कटात त्यांचे नाव गोवले गेल्यामुळे तात्यांनी पुन्हा अज्ञातवास पत्करला. विश्वासघातकी मित्रांमुळे त्यांना अटक झाली, पण पुरेसा पुरावा नसल्याने ते सुटले.
सेनापती बापटांनी मुळशीचा लढा लढवला आणि राजकारणाबरोबर त्यांनी विधायक समाजकार्यालाही सुरवात केली. त्यासाठी त्यांनी हातात झाडू घेतला. संयुक्त महाराष्ट्र व गोवामुक्ती या लढ्यांतही तात्या अग्रेसर राहिले. महात्माजीच्या प्रत्येक उपवासाच्या वेळी सेनापतीही उपोषण करत. बेळगावच्या प्रश्नासाठीही ते उपोषण करत होते; पण तत्पूर्वीच काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले.